IND vs ZIM, T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारतही सेमीफायनलमध्ये पोहोचला असून सर्वाधिक गुण घेत भारतानं सेमीफायनल गाठली आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताने 71 धावांनी विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेला. ज्यात भारतानं केएल राहुल आणि सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकांच्या जोरावर 186 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 115 धावांत झिम्बाब्वेला सर्वबाद करत भारतानं 71 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताचे गुणतालिकेत 8 गुण झाले असून दोन्ही ग्रुपमधील संघामध्ये भारताचेच गुण सर्वाधिक आहेत. भारतानं केवळ एक साखळी सामना (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) गमावला असून इतर सर्व सामने जिंकले आहेत.


सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत भारतानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत कमाल कामगिरीमुळे भारत आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता, त्यामुळे आजचा सामना औपचारिकता होती. तरीही एक मोठा विजय मिळवून सेमीफायनलमध्ये एन्ट्री करायची यासाठी कर्णधार रोहितनं पहिली फलंदाजी घेतली. ज्यानंतर रोहित आणि राहुल मैदानात आले, पण रोहित 15 धावा करुनच तंबूत परतला. कोहलीही 26 धावा करुन बाद झाला. पण राहुलने आज संयमी फलंदाजी करत 51 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारनं क्रिजवर आल्यापासून फटकेबाजी कायम ठेवली. त्याला पांड्याने 18 धावांची मदत करत एक चांगली भागिदारी उभारली. सामन्यात अवघ्या 25 बॉलमध्ये नाबाद 61 धावा करत सूर्यकुमारने भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचवली.


सिकंदर रझाची झुंज व्यर्थ


187 धावांचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच बॉलवर त्यांचा सलामीवीर वेस्ले भुवीच्य बोलिंगवर कोहलीच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर झिम्बाब्वेचे विकेट्स पडणं कायम होतं. भारताच्या गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा कोणताच फलंदाज टिकू शकत नव्हता. पण त्यांचा स्टार फलंदाज सिकंदर रझा (34) याने मात्र एकहाती झुंज दिली. त्याला आर. बर्ल (35) यानेही चांगली साथ दिली. पण अखेर दोघेही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अवघ्या 115 धावांत झिम्बाब्वेचा संघ सर्वबाद झाला आणि भारतानं 71 धावांनी विजय मिळवला. आता भारताची सेमीफायनलमध्ये झुंज इंग्लंडविरुद्ध 10 नोव्हेंबर रोजी असणार आहे. 


हे देखील पाहा-


Arshdeep Singh Life Story : वडील कॅनडाला पाठवत होते, पण गड्यानं एक वर्ष मागितलं आणि इतिहास घडवला