IND vs PAK, T20 World Cup 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात भारताने 4 विकेट्स राखून एक रोमहर्षक विजय पाकिस्तानवर मिळवला. विशेष म्हणजे अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात दर चेंडूनंतर सामना कधी भारताकडे तर कधी पाकिस्तानच्या दिशेने झुकताना दिसत होता. दरम्यान अखेरच्या षटकात दिनेश कार्तिककडे (Dinesh Karthik) सामना विजयाची संधी असताना त्याच्या चूकीमुळे तो बाद झाला, पण त्याचवेळी अश्विनने (Ashwin) प्रसंगावधान दाखवत भारताला विजय मिळवून दिला, ज्यानंतर कार्तिक आश्विनला ''माझ्यामुळे सामना भारत पराभूत झाला असता तर मी खूप ट्रोल झालो असतो, मला त्यापासून वाचवल्याबद्दल धन्यवाद'' असं म्हणाला.


नेमकं काय घडलं?


तर विराट-हार्दिकच्या जोडीने भारताला कठीण परिस्थितीतून सावरुन विजयाच्या अगदी जवळ आणलं, पण तेव्हाच हार्दिक बाद झाला, ज्यानंतर कार्तिकला क्रिजवर यावं लागलं. ज्यानंतर कार्तिकने एक धावही घेतली, मग भारताला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूत दोन धावांची गरज होती. पण अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला. कार्तिक बाद होताच पाकिस्तानने सामन्यात जवळपास पुनरागमन केलं.  पण त्याचवेळी अश्विन क्रिजवर आला आणि त्याने प्रसंगावधान दाखवत वाईडच्या दिशेने जाणारा चेंडू सोडला हा तसाच चेंडू होता, ज्यावर कार्तिक बाद झाला होता. त्यामुळे अश्विनने वाईडचा चेंडू सोडताच भारताला अतिरिक्त धाव मिळाली, ज्यानंतर अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत भारताला विजयही मिळवून दिला. दरम्यान अशा स्थितीत जर भारत सामना जिंकला नसता तर एक फलंदाज असून कार्तिक अवघ्या काही धावा करु न शकल्यामुळे तो भयानक ट्रोल झाला असता, ज्यामुळेच सामन्यानंतर त्याने अश्विनला, "मला वाचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद." असं म्हणाला.


पाहा VIDEO : 




कसा घडला सामना?


नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला भारतासमोर आधी फलंदाजी करणं अवघड ठरत असल्यानं रोहितनं हा निर्णय़ घेतला. त्यानुसारच भारतीय गोलंदाजांनी सुरुवातही दमदार केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबरला 0 धावांवर तंबूत धाडत अर्शदीपने पहिली विकेट घेतली. त्यानंतरही भारताने गोलंदाजी कसून सुरुच ठेवली. 4 धावा करुन रिझवानही बाद झाला. पण त्यानंतर शान मकसूद (52) आणि इफ्तिकार अहमद (51) यांनी डाव सावरला आणि दोघांनी दमदार अर्धशतकं ठोकत पाकिस्तानची धावसंख्या सावरली. त्यांच्याशिवाय इतर फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. पण गोलंदाज शाहीन आफ्रिदीने 8 चेंडूत 16 धावांची खेळी करत आणखी योगदान दिलं. ज्यामुळे पाकिस्तानने 159 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.


भारतीय संघानं 160 धावांचं लक्ष्य गाठताना चार विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची महत्वाची विकेट्स गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, विराट कोहलीनं संघाची बाजू संभाळून ठेवत भारताला विजय मिळवून दिला.


हे देखील वाचा-