World Cup 2019 Ind Vs SA | विजयी सलामीने टीम इंडियाची 'चहल' पहल
नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत केवळ 227 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 48 षटकांत चार गडी गमावत हे आवाहन सहज पार केलं.
टीम इंडियाने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. रोहित शर्माची शतकी खेळी आणि युजवेंद्र चहलच्या तूफान गोलंदाजीमुळे (4/51) भारताने विश्वचषकात दमदार सुरुवात करत 228 धावांचं लक्ष्य पार केलं.
टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने या सामन्यात 128 चेंडूंमध्ये शतक साजरं केलं. रोहितचं वन डे कारकीर्दीतलं हे तेविसावं आणि विश्वचषकातलं दुसरं शतक ठरलं. या सामन्यात भारतीय विजयाच्या आशा या रोहितवरच केंद्रित झाल्या होत्या. रोहित 122 धावांवर नाबाद राहिला.
साऊदम्पटनमधल्या रोज बाऊल स्टेडियमवर टीम इंडियाचा सलामीचा सामना रंगला. दक्षिण आफ्रिकेचा यंदाच्या विश्वचषकातला हा सलग तिसरा पराभव ठरला. याआधी इंग्लंड आणि बांगलादेशकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र विजयाचं खातं उघडण्याचं दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न अधुरंच राहिलं.
कर्णधार फाफ डू प्लेसिसने डुसेनच्या जोडीने 54 धावांची भागिदारी रचली होती, मात्र चहलने दक्षिण आफ्रिकेचं डाव सावरण्याचं स्वप्न भंग केलं. चहलने एकाच षटकात दोघा फलंदाजांना माघारी धाडलं.