नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. जवळपास 8 महिन्यानंतर 38 वर्षीय आशिष नेहराचं पुनरागमन झालं आहे. तर सुरेश रैना, युवराज सिंह आणि अमित मिश्रा यांच्या हाती पुन्हा एकदा निराशा लागली आहे.


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी घेण्यात आलेल्या यो-यो फिटनेस टेस्टमध्ये युवराज सिंह आणि सुरेश रैना अपात्र ठरले होते. त्यामुळे दोघेही टी-20 मालिकेसाठी कसून सराव करत होते. मात्र त्यांची निवड करण्यात आली नाही.

दुसरीकडे आशिष नेहराने फिटनेसच्या बळावर संघात पुनरागमन केलं आहे. कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीही फिट असलेल्या खेळाडूंनाच संघात घेण्यासाठी आग्रही आहेत.

रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन अश्विन सध्या संघातून बाहेर आहेत. त्यामुळे फिटनेसच्या बळावर संघात जागा मजबूत करणं हे खेळाडूंसमोरचं मोठं आव्हान बनलं आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल , मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्र सिंह धोनी(विकेटकीपर), हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, अक्षर पटेल