मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला रेलरोको अवघ्या दोन मिनिटात संपला, त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सकाळी सव्वानऊच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वात हा रेल रोको करण्यात आला.


जितेंद्र आव्हाड सव्वा नऊच्या सुमारास कार्यकर्त्यांसह आंदोलनासाठी कळवा स्टेशनवर आले. मात्र आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अवघ्या दोन मिनिटात ताब्यात घेऊन बाजूला केलं.

त्यामुळे एकही लोकल थांबून राहिली नाही. शिवाय लोकांचा खोळंबाही झाला नाही. आव्हाडांनी रेलरोको करुन लोकांना त्रास देऊ नये, अशी भावना सोशल मीडियावर आणि रेल्वे सुरक्षा संघानेही व्यक्त केली होती.

चेंगराचेंगरीत मुंबईकरांचा बळी

एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.

संबंधित बातमी : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा 23 वर