भोपाळ (मध्य प्रदेश): विराट कोहलीच्या टीम इंडियानं इंदूरच्या तिसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला.


या विजयासह टीम इंडियानं मालिकाही खिशात घातली. या मालिकेत भारताची आता 3-0 अशी विजयी आघाडी झाली आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने 78 धावांची खेळी केली.

फलंदाजीसाठी पंड्याला प्रमोशन

या विजयानंतर विराट कोहलीने अष्टपैलू हार्दिक पंड्याचं तोंडभरुन कौतुक केलं. इतकंच नाही तर हार्दिक पंड्याला फलंदाजीसाठी बढती कुणाच्या सांगण्यावरुन केली, याबाबतचा खुलासाही कोहलीने केला.

कोहली म्हणाला, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या सांगण्यावरुनच हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं.

चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या पंड्याने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 72 चेंडूत 78 धावा ठोकल्या. त्यामुळेच भारताने ऑस्ट्रेलियाचं 294 धावांचं लक्ष्य सहज पार केलं.

यावेळी पंड्याचं कौतुक करताना कोहली म्हणाला, "पंड्या हा धडाकेबाज ऑलराऊंडर आहे. या विजयामुळे मी खूपच आनंदी आहे. पंड्या एक स्टार आहे. फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण पंड्या सर्वातच सुपर आहे. आम्हाला अशा खेळाडूची गरज होती, जी पंड्याने पूर्ण केली. एक स्फोटक ऑल राऊंडरच्या रुपाने पंड्या टीम इंडियाला मिळाला आहे. पंड्याला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय रवी (शास्त्री) भाईचा होता".

यावेळी कोहलीने फिरकीपटू कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांचीही प्रशंसा केली.

भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय

या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 294 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेनं 139 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा पाया रचला. मग हार्दिक पंड्या आणि मनीष पांडेनं त्या पायावर विजयाचा कळस चढवला.

रोहित शर्मानं सहा चौकार आणि चार षटकारांसह ७१ धावांची, तर अजिंक्य रहाणेनं नऊ चौकारांसह ७० धावांची खेळी केली. मग हार्दिक पंड्यानं ७८ धावांची खेळी उभारून भारताला विजयपथावर नेलं. मनीष पांडेनंही भारताच्या विजयात नाबाद ३६ धावांचं योगदान दिलं.