नागपूर: क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे बीसीसीआयवर नाराजी व्यक्त करणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नवा मुद्दा उपस्थित करण्याच्या तयारीत आहे.


कोहलीने आता बोर्डाच्या कमाईमध्ये खेळाडूंचा वाटा वाढवण्याची मागणी केली आहे. बोर्डाला जेव्हढे पैसे मिळतात, त्यापैकी खेळाडूंना मिळणाऱ्या पैशाचा वाटा वाढवा, असं कोहलीने म्हटलं आहे.

सध्या टीम इंडियाच्या अ श्रेणीतील खेळाडूंना जवळपास वार्षिक 20 कोटी रुपये मानधन मिळतं.

येत्या शुक्रवारी दिल्लीत बीसीसीआयची बैठक आहे, या बैठकीत खेळाडूंच्या मानधनाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.

बोर्डाने सप्टेंबर महिन्यात टेलिव्हिजन प्रसारणाचे हक्क वितरित करण्याबाबत मोठा व्यवहार केला आहे. आयपीएल प्रसारणाचे हक्क स्टार इंडियाला देण्यात आले आहेत. त्यासाठी तब्बल 2.5 अब्ज डॉलरची डील झाली आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंचा करार 30 सप्टेंबरला संपला आहे. त्यामुळे खेळाडूंच्या नव्या करारात पगार आणि भत्त्यांमध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे.

बोर्डाच्या बैठकीत कर्णधार विराट कोहलीसह माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे खेळाडूंच्या पगारवाढीची मागणी करु शकतात.

हे तीघेही बीसीसीआयचे अध्यक्ष विनोद राय यांच्याकडे ही मागणी करु शकतात.