मुंबई : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावे आहे. लाराने कसोटी सामन्यात एका डावात 400 धावा केल्या आहेत. लाराचा विक्रम अद्याप कुणालाही मोडणे शक्य झालेलं नाही. मात्र आपला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा मोडू शकतात, असा विश्वास ब्रायन लाराने व्यक्त केला आहे.


आक्रमक खेळणारे खेळाडू असे असतात, जे कोणताही विक्रम मोडण्याची क्षमता ठेवतात, असं लाराने म्हटलं. विराट कोहली सध्या ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे, जितक्या धावा करत आहे, त्यावरुन विराटमध्ये माझा विक्रम मोडण्याची क्षमता आहे, असं ब्रायन लाराने सांगितलं. तर रोहित शर्मामध्येही माझा हा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. रोहित एक किंवा अर्ध्या दिवसात माझा विक्रम मोडू शकतो, असं लाराने म्हटलं.


विराट आणि रोहित शर्माशिवाय ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नरदेखील माझा 400 धावांचा विक्रम मोडू शकतो. काही दिवसांपूर्वीच डेविड वॉर्नरने पाकिस्तान विरोधात 335 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यावेळी वॉर्नर लाराचा विक्रम मोडणार असं वाटत होतं. मात्र ऐनवेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने डाव घोषित केला आणि वॉर्नरला मागे परतावं लागलं. लाराने त्यानंतर डेविड वॉर्नरशी बातचित केली होती. ऑस्ट्रेलियाच्या डावाची घोषणा करण्याचा निर्णय माझ्या एकट्याचा नव्हता, संपूर्ण संघाचा तो निर्णय होता. त्यावेळी पावसाची शक्यता असल्याने तो निर्णय योग्य असल्याचे डेविड वॉर्नरने सांगितलं.


ब्रायन लाराने 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध 400 धावांचा डोंगर उभारला होता. लाराने 582 चेंडूत 400 धावा ठोकत इतिहास रचला होता. यामध्ये 43 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजमध्ये विंडीजचा सलग तीन सामन्यात पराभव झाला होता. त्यामुळे कर्णधार ब्रायन लारावर टीका होत होती. तसेच तीन सामन्यात लाराने अवघ्या 100 धावाच केल्या होत्या. यामध्ये लारा दोन वेळा शुन्यावर बाद झाला होता. मात्र त्यानंतर चौथ्या सामन्यात लाराने 400 धावा ठोकत आपल्या टीकाकारांना बॅटने उत्तर दिलं.