मुंबई : विराट कोहलीनं कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या कसोटी कर्णधाराची आयसीसी क्रमवारीतली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.


इंग्लंड संघाच्या भारत दौऱ्यातल्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी, कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत विराट कोहली चक्क पंधराव्या स्थानावर होता. मात्र तीन कसोटी सामन्यांमध्ये 405 धावांचा रतीब घालून, त्यानं तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

विराटच्या खात्यात एव्हाना 833 गुण जमा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 मध्ये अव्वल आणि आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये विराट दुसऱ्या स्थानी आहे. कसोटी क्रमवारीतही अव्वल स्थान गाठण्यासाठी विराट उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.

कोहलीच्या नेतृत्वात मोहाली कसोटीत टीम इंडियाला इंग्लंडवर आठ विकेट्स राखून विजय मिळवता आला. तीन कसोटी सामन्यांनंतर भारताला 2-0 अशी आघाडी मिळाली आहे.

कोहलीशिवाय चेतेश्वर पुजारानेही गुणतालिकेत आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ अव्वल, तर इंग्लंडचा ज्यो रुट दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहली आणि रुटमध्ये 14 गुणांची तफावत आहे.

दुसरीकडे भारताचा ऑफ-स्पिनर आर अश्विनने कसोटी गोलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटू अशा दोन्ही यादींमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे.