मुंबईत आयपीएलमधील क्रिकेटपटूंवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, पोलिसांना सतर्कतेचा इशारा
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2019 04:55 PM (IST)
हॉटेल आणि स्टेडियममध्ये सुरक्षा व्यवस्थाही वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी कोणत्याही खेळाडूला सुरक्षेशिवाय बाहेर जाण्यास मनाई केली आहे.
मुंबई : आयपीएलमधील क्रिकेटपटूंवर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने दिला आहे. एटीएसने अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुप्तचर खात्याने हा इशारा दिला आहे. मुंबईतील ट्रायडंट हॉटेल आणि वानखेडे स्टेडियमची रेकी केल्याचं दहशतवाद्यांनी चौकशीत सांगितलं होतं. ट्रायडंट हॉटेलमध्ये खेळाडू थांबतात आणि तिथूनच वानखेडे स्टेडियममध्ये सराव आणि सामने खेळतात. या माहितीनंतर अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांना खेळाडूंची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यामुळे खेळाडूंना त्यांच्या बससह एस्कॉर्टसाठी मॅक्समन कॉम्बॅट वाहन वापरण्यास सांगितलं आहे. याशिवाय हॉटेल आणि स्टेडियममध्ये सुरक्षा व्यवस्थाही वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी कोणत्याही खेळाडूला सुरक्षेशिवाय बाहेर जाण्यास मनाई केली आहे.