नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेहून आल्यानंतर टीम इंडिया नव्या तयारीला लागणार आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि भारत यांच्यातील तिरंगी मालिकेची तयारी असेल. या मालिकेची घोषणा अगोदरच करण्यात आली होती, मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे.


ही मालिका 8 मार्च ते 20 मार्च या काळात नियोजित होती. मात्र आता 6 ते 18 मार्च या काळात ही तिरंगी मालिका खेळवण्यात येईल. श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला 70 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे.

या मालिकेचं नाव 'निढास ट्रॉफी' ठेवण्यात आलं आहे, ज्यामध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला सामना होईल. प्रत्येक संघ आपापसात दोन सामने खेळणार असून पहिले दोन संघ 18 मार्चला अंतिम सामन्यात भिडतील. सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये खेळवण्यात येतील.

तिरंगी मालिकेचं वेळापत्रक

  • 6 मार्च : भारत वि. श्रीलंका

  • 8 मार्च : भारत वि. बांगलादेश

  • 10 मार्च : श्रीलंका वि. बांगलादेश

  • 12 मार्च : भारत वि. श्रीलंका

  • 14 मार्च : भारत वि. बांगलादेश

  • 16 मार्च : श्रीलंका वि. बांगलादेश

  • 18 मार्च : अंतिम सामना