नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा टीम इंडियाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नवी दिल्लीत झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत हा निर्णय झाला.


महसूल वाटपाच्या मुद्द्यावरुन आयसीसीसोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ अद्यापही जाहीर नसल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी भारताच्या सहभागावर टांगती तलवार होती.

बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी के खन्ना यांनी टीम इंडिया या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे संकेत शनिवारीच दिले होते. अखेर बीसीसीआयच्या सभेनंतर भारताला हिरवा कंदील मिळाला.

या स्पर्धेसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ सोमवारी म्हणजे आठ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. यासाठी बहुतांश देशांची संघ निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

इंग्लंडमध्ये 1 जून रोजी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात होणार आहे.
भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी झाल्यानंतर भारताची पहिलीच लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 4 जूनला होणार आहे.