शिमला : ऑस्ट्रेलियावरील मालिका विजयाबरोबरच भारताचं कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थानही आणखी भक्कम झालं आहे. कसोटी संघांमध्ये भारत सध्या 122 गुणांसह पहिल्या तर ऑस्ट्रेलिया 108 गुणांसह दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका 107 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


त्याखालोखाल इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडीजचा क्रमांक लागतो.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वन डेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली. भारताने बॉर्डर-गावसकर मालिका 2-1 ने जिंकली.

टीम इंडियाने 19 महिन्यात सलग सातव्यांदा मालिका विजय मिळवला आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमाअखेरीस भारताने अव्वल स्थान कायम राखलं आहे.

मोसमाअखेरीस आयसीसीची कसोटीतील अव्वल स्थानासाठीची गदाही भारताचा कर्णधार विराट कोहलीला प्रदान करण्यात आली. तसंच टीम इंडियाला आयसीसीकडून दहा लाख अमेरिकन डॉलर्सचं इनामही मिळालं आहे.

आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील असलेले सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला गदा आणि चेक सुपूर्द केला.