कोलंबो/मुंबई : दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या षटकाराने खरोखरच कमाल केली. टीम इंडियाने या षटकारासह बांगलादेशच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला आणि विजेतेपदाच्या करंडकावर आपलं नाव कोरलं. कोलंबोतल्या तिरंगी मालिकेने टीम इंडियाला त्या विजेतेपदासह गुणवान शिलेदारांचे काही नवे पर्याय दिले आहेत. पण दिनेश कार्तिकसारख्या अनुभवी शिलेदाराचा आता सातत्याने विचार करायला हवा, याची जाणीव करून दिली.


दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने बांगलादेशची खाशी जिरवली आणि कोलंबोतल्या तिरंगी मालिकेच्या विजेतेपदावर टीम इंडियाचं नावही कोरलं.

दिनेश कार्तिक मैदानात उतरला त्या वेळी टीम इंडियाला विजयासाठी बारा चेंडूंत तब्बल 34 धावांची आवश्यकता होती. समोर नवखा विजय शंकर चाचपडत उभा होता. पण टीम इंडियाच्या सुदैवाने दिनेश कार्तिकला स्ट्राईक मिळाला आणि त्याने रुबेल हुसेनवर हल्ला चढवला.

दिनेश कार्तिकने एकोणिसाव्या षटकात 22 धावांची लूट केली. त्यामुळे टीम इंडियाला अखेरच्या षटकांत सहा चेंडूंवर बारा धावांची गरज होती.

दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेला विजयी षटकार हा ट्वेन्टी ट्वेन्टीच्या इतिहासातला आजवरचा पाचवा निर्णायक स्ट्रोक होता. पण या षटकाराने आठवणी जाग्या झाल्या त्या शारजात जावेद मियाँदादने 1986 साली भारताच्या चेतन शर्माला षटकार ठोकून पाकिस्तानला ऑस्ट्रेलेशिया चषक जिंकून दिला त्या फायनलच्या.

त्या वेळी कपिलदेवच्या भारतीय संघावर रडण्याची वेळ आली होती. पण दिनेश कार्तिकच्या षटकाराने रोहित शर्माच्या टीम इंडियाला गुढीपाडवा साजरा करून दिला. कोलंबोच्या रणांगणात टीम इंडियाची सरशी झाली असली तरी अख्ख्या फायनलने चुरशीच्या खेळाचा आनंद लुटू दिला.

तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला तो रोहित शर्माच्या कर्णधारास साजेशा अर्धशतकाने. रोहित बाद झाला, त्या वेळी टीम इंडियाचं विजयाचं समीकरण 40 चेंडूंत 69 असं तुलनेत सोपं होतं. पण रोहितने अनुभवी दिनेश कार्तिकला मागे ठेवून विजय शंकरला फलंदाजीसाठी बढती दिली. हा निर्णय त्याच्या अंगलट येऊ शकला असता.

रोहित शर्माच्या सुदैवाने दिनेश कार्तिकने 8 चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 29 धावांची खेळी करून त्याचा विश्वास सार्थ ठरवला. विशेष म्हणजे ज्या महेंद्रसिंग धोनीने कार्तिकची आजवरची कारकीर्द झाकोळली, त्या धोनीची अनुपस्थिती त्याने जाणवू दिली नाही. त्यामुळे दिनेश कार्तिककडे धोनीचा पर्याय म्हणून पाहायचं का, अशीची चर्चा सुरु झाली.

क्रिकेट समीक्षकांच्या मते, दिनेश कार्तिक हा धोनीचा पर्याय आहेच. आजचा दिनेश कार्तिक हा उद्याचा धोनी असला तरी त्या दोघांच्या वयात केवळ चार वर्षांचंच अंतर आहे. धोनी हा 37 वर्षांचा, तर कार्तिक 33 वर्षांचा आहे. त्यामुळे टीम इंडियाला तिरंगी मालिकेच्या विजेतेपदाचा आनंद लुटताना भविष्याचाही विचार करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या :

विजयी षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे अखेरचे सहा चेंडू


दिनेश कार्तिकचा विजयी षटकार, तिरंगी मालिका भारताच्या खिशात