नवी दिल्ली/ फ्लोरिडा: भारतीय संघाने विराट कोलहीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजवर विक्रमी विजय मिळवल्यानंतर, आता टी-20 सामना खेळणार आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये भारत-वेस्ट इंडिजदरम्यान होणाऱ्या या एकमात्र टी-20 सामन्यात भारताला पाच महिन्यापूर्वीचे पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आहे.


 

भारताला 2011 प्रमाणेच 2016 मध्येही यजमान पद मिळाले होते. अन् सुरुवातीपासूनच भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली होती. उपांत्य फेरीत विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगले प्रदर्शन करून भारतीय संघाने 2/192 धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या 2011मधील विश्व चषकाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. मात्र, वेस्ट इंडिज संघाने यावर साफ पाणी फेरले. वेस्ट इंडिजच्या जॉनसन चार्लस, लेंडल सिमन्स आणि आंद्रे रसेल यांच्या दमदार खेळीने वेस्ट इंडीज संघाने 3/196 धावांनी विजय मिळवला.

 

नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने कसोटी क्रमवारीतील आपले वर्चस्व कायम राखले. मात्र, आता टी-20 मधील गेल्या पाच महिन्यापूर्वीचे पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आहे. धोनी ब्रिगेड फ्लोरिडामधील टी-20 सामन्यात पराभवाचे हे उट्टे काढून क्रिकेटप्रेमींच्या मनातील सल कमी करतील अशी अपेक्षा आहे.

 

दरम्यान, या दोन्ही संघामध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 सांमन्यांची आकडेवारी पाहिल्यास वेस्ट इंडिज टीम थोड्याफार फरकाने टीम इंडियाच्या पुढे आहे. या दोन्ही संघांमध्ये आजपर्यंत पाच टी-20 सामने खेळले गेले. यातील 3 सामन्यात वेस्टइंडीजने तर 2 वेळा भारतीय संघाने विजय मिळवला.