पोर्ट ऑफ स्पेन: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला आपल्या संघाने अव्वल स्थान गमावल्याची चिंता वाटत नाही, कारण त्याच्या मते भारतीय संघ रॅकिंगसाठी  खेळत नाही.


 

भारताला कसोटी क्रिकेटमधील आपले अव्वल स्थान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यातील चारही कसोटी सामने जिंकणे गरजेचे होते. मात्र, पावसामुळे चौथा सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे भारतीय संघाच्या पाठोपाठ असलेल्या पाकिस्तानी संघाने अव्वल स्थानी झेप घेतली.

 

यावर कोहलीला विचारले असता, तो म्हणाला की, ''जर पाकिस्तान संघाने विजय मिळवला नसता, किंवा भारत-वेस्ट इंडिज दरम्यानचा अंतिम सामना अनिर्णीत राहिला नसता, तर गोष्ट वेगळी होती. मात्र, दुसऱ्या संघाने आमच्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. त्यामुळे आम्ही कधी रॅकिंगची चिंता करत नाही. शेवटी हीदेखील एक स्पर्धा आहे, त्यामुळे चढ-उतार सुरुच राहतात. आम्हाला जगातील सर्वोत्कृष्ट संघ बनायचा आहे, आणि आमचेही हेच लक्ष्य आहे.''

 

 

कोहलीने यावेळी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि विकेटकिपर ऋद्धिमान साहाचे मुक्तकंठाने कौतुक केले. ''ही मालिका आमच्यासाठी अतिशय चांगली राहिली. या दौऱ्यादरम्यान आम्ही आमच्यात खूप सुधारणा करू शकलो. तसेच संघाच्या कमकुवत बाजूही समजल्या. माझ्यासाठी या मालिकेतील साहाचे फॉर्म परत मिळवणे, आणि अश्विनने फलंदाजीसाठी सहाव्या क्रमांकावर उतरुन उत्तम कामगिरी करणे, या दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या.'' असे तो यावेळी म्हणाला.

 

भारतीय संघाने 2-0 ने ही मालिका जिंकली. पहिल्या कसोटीत भारतीय संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला. तर दुसरा सामना अनिर्णीत राहिला. याशिवाय तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने चांगली कामगिरी दाखवत, मोठ्या फरकाने हा सामना जिंकला. मात्र, चौथा सामना पावसाच्या व्यत्ययाने अनिर्णीत घोषित करण्यात आला.