कोलंबो : श्रीलंकेनं कोलंबो कसोटी वाचवण्यासाठी दुसऱ्या डावात केलेला कठोर संघर्ष अखेर अयशस्वी ठरला. टीम इंडियानं श्रीलंकेचा दुसरा डाव 386 धावांत रोखून, कोलंबो कसोटीत एक डाव आणि 53 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. भारतानं या विजयासह तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.


श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात कुशल मेंडिसपाठोपाठ दिमुथ करुणारत्नेनंही झुंजार शतक झळकावलं. करुणारत्नेनं 307 चेंडूंत 16 चौकारांसह 141 धावांची खेळी उभारली. डावखुरा स्पिनर रवींद्र जाडेजानं करुणारत्नेचा काटा काढला आणि श्रीलंकेची झुंज संपुष्टात आली.

जाडेजानंच श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यानं 152 धावांत श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना माघारी धाडलं. रवीचंद्रन अश्विन आणि हार्दिक पंड्यानं प्रत्येकी दोन विकेट्स काढून त्याला छान साथ दिली.