नाशिक : सरकारी मालमत्तेची चोरी करण्यासाठीचा परवाना मिळावा असा अशी  आगळीवेगळी मागणी येवल्यातील एका शेतकऱ्यानं सरकारकडे केली आहे. शासनाच्या आडमुठेपणाचे धोरणामुळे शेती व्यवसाय करण्यापासून वंचित  राहिल्याने त्यानं ही मागणी केली आहे. कृष्णा भगवान डोंगरे असं येवला तालुक्यातील नगरसूलच्या शेतकऱ्याचं नाव असून त्यानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहिलं आहे.


येवल्यातील कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्याने सहा महिन्यांपूर्वी पाच एकरात कांद्याची लागवड केली होती. मात्र कांद्याच्या भावात सतत घसरण सुरु असल्याने, तसंच उत्पादन खर्चही फिटत नसल्यानं आपल्याच  शेतातील काढणीला आलेला कांदा जाळून टाकला. मात्र त्याची कुठलीही दखल शासनाने न घेतल्याने त्याने मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून इच्छा मरणाची मागणी केली होती.

दरम्यान त्याच्या कुठल्याच पत्राची दखल सरकारकडून घेतली गेली नाही. सरकारकडून त्याला कुठलीच मदत मिळाली नाही, त्यामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्याला पडला. त्यातच शेतीसाठी भांडवल नसल्यानं त्याने सरकारी मालमत्तेची चोरी करण्यासाठीचा परवाना मागण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडेच निवेदन पाठवले आहे.