मुंबई : रिओ ऑलिम्पिक, रिओ पॅरालिम्पिक आणि महिला विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या भारतीय खेळाडूंसह, या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा राज्य शासनाच्या वतीने गुरुवारी दुपारी विशेष गौरव करण्यात आला.


या खेळाडूंना राज्य शासनाच्या वतीने रोख इनाम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. रिओ ऑलिम्पिकच्या कांस्यपदक विजेत्या पैलवान साक्षी मलिकसह ललिता बाबर, दत्तू भोकनळ, देविंदर वाल्मिकी, कविता राऊत, आयोनिका पॉल या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सत्कारार्थींमध्ये समावेश होता.

रिओ पॅरालिम्पिकमधल्या पदकविजेत्या मरियप्पन थंगावेलू, देवेंद्र झाझरिया, दीपा मलिक आणि वरुण भाटी यांच्यासह महाराष्ट्राच्या सुयश जाधवलाही रोख इनामाने सन्मानित करण्यात आलं.

भारताला महिला विश्वचषकाची अंतिम फेरी गाठून देणाऱ्या महाराष्ट्राच्या पूनम राऊत, स्मृती मानधना आणि मोना मेश्राम यांचाही रोख इनामांच्या यादीत समावेश होता.