मुंबई : बीसीसीआयनं अखेर भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतवर घातलेली आजीवन बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आजीवन बंदी हटवून श्रीशांतच्या बंदीची शिक्षा ही सात वर्ष करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षी 13 सप्टेंबरला श्रीशांतवरील बंदी उठणार आहे. बीसीसीआयचे  लोकपाल डी के जैन यांनी श्रीशांतवरील बंदी उठवण्याचा हा महत्वपूर्ण आदेश दिला आहे. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी 13 सप्टेंबर 2013 साली श्रीशांतला आजीवन बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. याआधी 15 मार्चला सुप्रीम कोर्टानं श्रीशांतवारील आजीवन बंदी हटवली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या लोकपालांना तीन महिन्यांच्या आत शिक्षेच्या पुनर्निधारणाचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार लोकपाल डी के जैन यांनी प्रकरणाची पूर्ण चौकशी करुन श्रीशांतच्या शिक्षेविषयी आज महत्वपूर्ण घोषणा केली. लोकपालांच्या म्हणण्यानुसार श्रीशांतची आतापर्यंत सहा वर्षांची शिक्षा पूर्ण झाली आहे. त्यानं केव्हाच वयाची तिशीही गाठली आहे. त्यामुळे त्याची शिक्षा कमी करणं योग्य आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण: श्रीशांतवर मे 2013 साली एका आयपीएल सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप होता. पण श्रीशांतनं त्या आरोपांचं खंडन करताना हे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी श्रीशांत राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. श्रीशांतसह दिल्ली पोलिसांनी मे  2013 साली अजित चंडेला आणि अंकित चव्हाण या तिघांना याप्रकरणी अटक करुन कारवाई करण्यात आली होती. श्रीशांतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द: 25 ऑक्टोबर 2005 साली श्रीशांतनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. भारत आणि श्रीलंका संघांमध्ये नागपूरमध्ये खेळवण्यात आलेला वन डे सामना श्रीशांतच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला पहिला सामना होता. दरम्यान श्रीशांतनं भारताकडून 27 कसोटी, 53 वन डे आणि 10 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीत त्यानं 37.59 च्या सरासरीनं 87, वन डेत 33.44 च्या सरासरीनं 75 तर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याच्या नावावर 7 विकेट्स जमा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कामगिरी:सामने : 90विकेट्स : 169सरासरी : 35.90