नेमबाज अभिनव बिंद्राही भारतीय ऑलिम्पिकचा सदिच्छादूत
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2016 09:30 AM (IST)

नवी दिल्लीः भारतीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा एकमेव नेमबाज अभिनव बिंद्राची सदिच्छादूतपदी नियुक्ती केली आहे. सदिच्छादूत म्हणुन काम करण्याची तयारी बिंद्राने दर्शवली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाचा प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती अभिनव बिंद्राने ट्विटर द्वारे दिली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या सदिच्छादूत म्हणून बिंद्रासह मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर व संगीतकार ए आर रहमान यांनाही विचारणा करण्यात आली आहे. रिओ ऑलिम्पिकसाठी अभिनेता सलमान खानची सदिच्छादूत म्हणुन निवड झाल्यानंतर क्रीडा आणि चित्रपट विश्वातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग व कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी सलमानच्या निवडीवर नाराजीही व्यक्त केली होती. "मला भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष आणि महासचिवांनी सदिच्छादूत होण्यासंबंधी प्रस्ताव दिला होता. मला हा प्रस्ताव आला, तेव्हा मी लगेच होकार दिला. मी त्या पदाला न्याय देऊ शकतो, असे भारतीय ऑलिम्पिक समितीला वाटणं हाच माझा मोठा सन्मान आहे. विनम्र भावनेने मी तो प्रस्ताव स्वीकारत आहे. मी माझं पुर्ण आयुष्य ऑलिम्पिक स्पर्धेसाठी समर्पित केलं आहे. तसेच ऑलिम्पिकमध्ये भारताची चांगली कामगिरी व्हावी यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत देशवासियांना अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी करणं हे माझे लक्ष्य आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या मी नेहमी सोबत असेल." असं अभिनव बिंद्राने ट्विटरवर म्हटलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणारा प्रत्येक खेळाडू हा विजयी असतो. मी त्यांना पदोपदी मदत करेन, जोडीने मी माझ्या सरावाकडेही लक्ष केंद्रित करणार आहे, असा मानस बिंद्राने बोलून दाखवला आहे. https://twitter.com/Abhinav_Bindra/status/725967330203828224 https://twitter.com/Abhinav_Bindra/status/725967465033961472 https://twitter.com/Abhinav_Bindra/status/725968292159049728 https://twitter.com/Abhinav_Bindra/status/725972269059694593