नवी दिल्ली : नीट परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.  नीट प्रवेश परीक्षा 1 मे रोजीच होणार असून रविवारी होणाऱ्या परीक्षेसोबतच सोमवारच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


 

 
सुप्रीम कोर्टाने नीट संदर्भात आपले आदेश बदलण्याची मागणी फेटाळून लावली. तारखांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी अभ्यास करण्याचा सल्लाही सुप्रीम कोर्टाने दिला. नीट परीक्षा आणि राज्यांच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम वेगवेगळा असल्यामुळे तयारी करणं कठीण जात असल्याचं काही विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटलं होतं. मात्र विद्यार्थ्यांची ही याचिकाही कोर्टाने फेटाळल्यामुळे सोमवारच्या पुनर्विचार याचिकेकडे  लक्ष लागून राहिलं आहे.

 

 

नीट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली असताना मुख्यमंत्रीही त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. 'नीटच्या परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय अन्यायकारक आहे. नीटविरोधातील अनेक राज्य आमच्या भूमिकेशी सहमत आहेत. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात लढणार आहोत. नीटची परीक्षा 2018 पासूनच लागू करा', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.

 

 

मेडिकल प्रवेशासाठी ऐन वेळेस लागू  झालेल्या नीट परीक्षेला मोठा विरोध होतो आहे. आयत्या वेळच्या या निर्णयामुळे मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, अशी भीती सर्वत्र स्तरांतून व्यक्त होते आहे.

 

 

संबंधित बातम्या :


‘नीट’ची परीक्षा 1 मे रोजीच होणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश


सविस्तर वृत्त : ‘नीट’ परीक्षेचा नेमका घोळ काय आहे?