मुंबई : टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने अफगाणिस्तानविरुद्धच्या बंगळुरु कसोटीत नवा इतिहास घडवला. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहाराआधीच शतक झळकावणारा तो भारताचा पहिला आणि जगातला सहावा फलंदाज ठरला. पण दुर्दैवाची बाब म्हणजे शिखर धवन पुन्हा अल्पसंतुष्ट ठरला. उपाहारानंतर एक खराब फटका खेळून तो माघारी परतला.


टीम इंडियाचा गब्बरही खुश झाला. पण बंगळुरु कसोटीत त्याचं पोट विक्रमी शतकानंच भरलं.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवशी उपाहाराआधी शतक झळकावणारा शिखर धवन हा भारताचा पहिला आणि जगातला सहावा फलंदाज ठरला. त्याच्या फलंदाजीने मायबाप पब्लिकही खुश झालं. पण शिखर धवननं चिन्नास्वामी स्टेडियमवर एक महाविक्रमी खेळी उभारण्याची संधी वाया दवडली. अफगाणिस्तानच्या यामिन अहमदझाईला त्यानं आपली विकेट बहाल केली.

शिखर धवनने बाद होण्याआधी एक आगळा विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहाराआधी शतक झळकावणारा तो भारताचा पहिला आणि जगातला सहावा फलंदाज ठरला.

शिखर धवनआधी हा पराक्रम कोणी कोणी गाजवला?

1902 - ऑस्ट्रेलिया - व्हिक्टर ट्रम्पर,
1926 - ऑस्ट्रेलिया - चार्लस मॅकार्टनी,
1930 - ऑस्ट्रेलिया - डॉन ब्रॅडमन (इंग्लंडविरुद्ध कसोटी)
1976-77 - पाकिस्तान - माजिद खान - (न्यूझीलंडविरुद्ध कसोटी)
2016-17 - ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर - (पाकिस्तानविरुद्ध सिडनी कसोटी)

टीम इंडियाच्या गब्बरनं त्या पाच जणांच्या पावलावर पाऊल ठेवताना चौकार आणि षटकारांची जणू उधळण केली.

बंगळुरु कसोटीत पहिल्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला, त्यावेळी धवननं 91 चेंडूंत 19 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी उभारली होती. याचा अर्थ खाईन तर तुपाशी या बाण्यानं खेळून त्यानं 94 धावा निव्वळ चौकार आणि षटकारांनी जमवल्या. उपाहारानंतर धवननं आपल्या धावसंख्येत केवळ चार धावांची भर घातली आणि तो माघारी परतला.

शिखर धवनला खरं तर बंगळुरुत एक मोठी खेळी उभारण्याची संधी होती. समोरचं आक्रमण अननुभवी होतं आणि टीम इंडियाच्या हाताशी मुबलक वेळही होता. पण ट्वेन्टी ट्वेन्टी आणि कसोटी क्रिकेट या मानसिक द्वंद्वातून टीम इंडियाचा गब्बर अजूनही बाहेर पडलेला दिसत नाही. आयपीएलचा फॉर्म कायम राखताना त्याने ट्वेन्टी ट्वेन्टीला साजेसा फटका खेळून आपली विकेट बहाल केली.

वास्तविक शिखर धवननं ज्याच्याकडून आक्रमक फलंदाजीचा वारसा घेतला आहे, त्या वीरेंद्र सहवागनं कसोटी क्रिकेटमध्ये एक नाही, तर दोन दोन त्रिशतकं ठोकली आहेत. सहवागचा हा आदर्शही धवननं घ्यायला हवा. त्यासाठी कसोटीत बॅट लागली आणि धावांचा ओघ सुरु असतो, अशा वेळी खराब फटके टाळायचे असतात हे धवनला आम्ही सांगण्याची गरज नाही.