मुंबई : भारताच्या विश्वचषक संघातून वारंवार डावलण्यात आलेल्या अंबाती रायुडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समधून निवृत्ती जाहीर केली आहे. माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी एबीपी माझाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. निवड समितीच्या कारभारावरही संदीप पाटील यांनी बोट ठेवलं. संदीप पाटील आणि अंबाती रायुडू फार जवळचे मानले जातात.


अंबातीची निवड विश्वचषकात होणं अपेक्षित होतं, मात्र त्याला डावललं गेल्याचं संदीप पाटील यांनी सागितलं. डावलल्याच्या भावनेतूनच त्याने निवृत्तीची घोषणा केली आणि त्यानंतर आपल्याशी बोलताना गहिवरुन आल्याचंही संदीप पाटील यांनी स्पष्ट केलं.

अंबाती रायुडू काही महिन्यांपूर्वी झालेल्या योयो टेस्टमध्ये फेल झाला होता. त्यावेळीही संदीप पाटील यांनी त्याची समजूत काढली होती. त्याला जास्त प्रयत्न करुन फीटनेस वाढवण्याचा सल्लाही संदीप पाटील यांनी दिला होता.



निवृत्तीनंतर भविष्यात फक्त आयपीएल आणि त्यासारख्या लीग्समध्ये खेळण्याचा रायुडूचा प्रयत्न आहे. बीसीसीआयच्या निवड समितीनं अंबाती रायुडूला डावलून पहिल्यांदा विजय शंकरची भारताच्या विश्वचषक संघात निवड केली होती. त्यावेळी रायुडू, ऋषभ पंत आणि नवदीप सैनी यांचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता.

शिखर धवनला दुखापत झाल्यावर लोकेश राहुलला सलामीला बढती देण्यात आली आणि धवनऐवजी पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्यानंतर विजय शंकरला दुखापत झाल्यावरही निवड समितीनं रायुडूला डावलून सलामीच्या मयांक अगरवालची विश्वचषक संघात वर्णी लावली.