केपटाऊन : टीम इंडियाचा विकेटकीपर रिद्धीमान साहाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत नव्या विक्रमाची नोंद केली. एकाच कसोटीत 10 फलंदाजांना माघारी पाठवणारा तो पहिलाच भारतीय विकेटकीपर ठरला.


यापूर्वी हा विक्रम टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता. 2014 साली मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 9 फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

केपटाऊन कसोटीच्या चौथ्या दिवशी साहाने या विक्रमाची नोंद केली. साहाने दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी 5 असे एकूण 10 झेल घेतले. आतापर्यंत त्याने 85 फलंदाजांना बाद केलं आहे, ज्यामध्ये 10 स्टम्पिंगचा समावेश आहे.

साहाने माजी विकेटकीपर फारुख इंजिनियर यांनाही मागे टाकलं. त्यांच्या नावावर कसोटीत 82 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम आहे.

साहाने आता ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर अॅडम गिलख्रिस्ट आणि इंग्लंडच्या विल्यम टेलरची बरोबरी केली आहे, ज्यांच्या नावावर एकाच कसोटीत 10 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम आहे.

इंग्लंडचा जॅक रसेल आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सच्या नावावर एकाच कसोटीत 11 विकेटचा विक्रम आहे. साहा या दोघांच्याही विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे.