India vs Australia : सात जानेवारीपासून सिडनी येथे सुरू होणार्‍या तिसर्‍या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी चांगली बातमी आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या जैवसुरक्षा नियमांचा भंग केल्याप्रकरणी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार आहे. मेलबर्नमधील एका रेस्टॉरंटमध्ये या पाच खेळाडूंच्या जेवणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला तपास सुरू करत या पाचही खेळाडूंना अलगीकरणात पाठवलं होतं.


सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या अहवालानुसार, बीसीसीआय व्यावहारिक पद्धतीने ही घटना हाताळणार असून बायो सिक्योरिटी प्रोटोकॉल तोडल्याबद्दल पाचही खेळाडूंना दंड ठोठावण्याची शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या खेळाडूंना शिक्षा देऊ शकत नाही, कारण हे खेळाडू त्याचे कर्मचारी नाहीत.


रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) जाण्यासाठी भारतीय संघाने दोन बस घेतल्या. मात्र, पावसामुळे सरावाचे सत्र रद्द झाल्याने टीमने जिम सत्र आयोजित केले.


अहवालानुसार, गिल टीमच्या बसमध्ये चढला आणि टीमच्या उर्वरित सदस्यांसह परत आला. संघाच्या प्रवक्त्याने सांगितले, की भारतीय संघाने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले आहे. दरम्यान, भारतीय खेळाडूंनी बायो सिक्योर प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी डिसेंबरच्या सुरुवातीला विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी सिडनीतील एका दुकानात फोटो काढला होता.


क्वीन्सलँड सरकारने लागू केलेल्या कठोर लॉकडाऊन नियमांमुळे ब्रिस्बेन येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जाऊ इच्छित नाही, अशी बातमी देखील आहे. क्विन्सलँड सरकारने म्हटले आहे की भारतीय संघाने नियमांचे पालन न केल्यास ते खेळू शकणार नाहीत. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 च्या बरोबरीत आहे. मालिकेचा तिसरा सामना सात जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळला जाणार आहे.


संबंधित बातमी : 


INDvsAUS | IND vs AUS : तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडिया अडचणीत, बायो बबल नियमाचं उल्लघन केल्यानं रोहित शर्मासह पाच खेळाडू आयसोलेट