रिओ दि जनैरो : तब्बल 36 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणाऱ्या भारताच्या महिला हॉकी संघानं पहिल्याच सामन्यात जपानला 2-2 असं बरोबरीत रोखण्याचा पराक्रम गाजवला आहे.


 
महिला हॉकीच्या जागतिक क्रमवारीत भारत तेराव्या, तर जपान दहाव्या क्रमांकावर आहे. त्यात जपाननं पहिल्या दोन सत्रांमध्ये 2-0 अशी आघाडी घेऊन सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. त्या प्रतिकूल परिस्थितीत भारतीय महिलांनी संघर्षपूर्ण खेळ करुन जपानला 2-2 असं बरोबरीत रोखलं.

 
जपानकडून एमी निशिकोरीनं 15 व्या आणि नाकाशिमानं 28 व्या मिनिटाला गोलची नोंद केली होती. भारताच्या रानी रामपालनं 31 व्या आणि लिलिमा मिन्झनं 40 व्या मिनिटाला प्रत्येकी एक-एक गोल केला.