नवी दिल्ली : बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचा राजीनामा दिल्यानंतर रामचंद्र गुहा यांनी पत्राद्वारे खळबळजनक आरोप केले आहेत. या पत्रात गुहाने टीम इंडियाच्या आजी माजी स्टार खेळाडूंवर हल्लाबोल केला आहे. संघाच्या सीनियर खेळाडूंना दिलं जाणारं विशेष महत्त्व आणि नियम धाब्यावर बसवून त्यांना फायदा पोहोचवण्याच्या कृत्यावर गुहा यांनी सडकून टीका केली आहे. राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयचे चेअरमन विनोद राय यांना लिहिलेल्या पत्रात रामचंद्र गुहा यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 30 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांची बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. परंतु वैयक्तिक कारणांचा दाखला देत रामचंद्र गुहा यांनी पदाचा राजीनामा दिला. सात कारणांमुळे राजीनामा आजच्या (2 जून 2017) पत्रात गुहा यांनी राजीनाम्यामागे सात महत्त्वाच्या कारणांचा उल्लेख केला आहे. बीसीसीआयमध्ये पारदर्शकता नसल्याचं सांगत प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या खेळाडूंना बीसीसीआय आणि प्रशासकीय समितीद्वारे दिली जाणारी सूट यावरही गुहा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. गुहा यांनी पत्रात केलेले आरोप रामचंद्र गुहा यांनी विनोद राय यांना लिहिलेल्या पत्रात राहुल द्रविड, सुनील गावसकर तसंच महेंद्रसिंह धोनी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्य प्रशिक्षक आयपीएलसाठी राष्ट्रीय संघाकडे दुर्लक्ष करत आहे. दिल्ली डेअर डेव्हिल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा टीम इंडिया ए आणि ज्युनियर भारतीय संघाचाही प्रशिक्षक आहे. सुनील गावसकर हे खेळाडूंच्या मॅनेजमेंट कंपनीचे प्रमुख आहेत. तरीही बीसीसीआयने कॉमेंट्रीसाठी त्यांची निवड केली आहे. कसोटी क्रिकेट संघात नसतानाही महेंद्रसिंह धोनीला 'ए' ग्रेडमध्ये ठेवलं आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला. प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेची कामगिरी चांगली असतानाही, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी त्यांच्यावर वाद निर्माण केला आहे. प्रशासकीय समिती प्राथमिक श्रेणीच्या क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करते. हे खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळाणारे खेळाडू यांच्यातील फीमधील अंतर फारच जास्त आहे. निलंबित केलेले अधिकारी बीसीसीआयच्या बैठकीत सहभाही होतात, तरीही प्रशासकीय समिती यावर मौन बाळगते. प्रशासकीय समितीत जवागल श्रीनाथचा समावेश करायला हवा.