मुंबई/नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा टीम इंडियाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नवी दिल्लीत झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत हा निर्णय झाला.


त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात कुणाची वर्णी लागणार आणि कुणाची एक्झिट होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारतीय संघाची निवड करताना एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती एखादा धाडसी निर्णय घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टीम इंडियाच्या काही प्रमुख शिलेदारांना सध्या ढासळलेला फॉर्म आणि दुखापतींनी ग्रासलं आहे. आयपीएलमध्ये रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, महेंद्रसिग धोनी आणि केदार जाधवला सातत्यपूर्ण कामगिरी बजावता आलेली नाही.

दुसरीकडे रवीचंद्रन अश्विनने दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. तर रवींद्र जाडेजाची गोलंदाजीही निष्प्रभ ठरली. या पार्श्वभूमीवर निवड समिती आणखी काही खेळाडूंचा विचार करू शकते.

अनुभवी खेळाडुंना आयपीएलमधील फॉर्मचा फायदा होणार?

अनुभवी फलंदाज युवराज सिंह, सलामीवीर गौतम गंभीर आणि फिरकीपटू हरभजन सिंग या अनुभवी खेळाडुंचा विचार निवड समिती करु शकते.

आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण खेळी करणारे रॉबिन उथप्पा, सुरेश रैना आणि पार्थिव पटेल यांच्या नावाचाही पर्याय निवड समितीसमोर असेल.

यजुवेंद्र चहल आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत प्रभावी मारा करणारा कुलदीप यादव या सर्वांचे पर्यायही निवड समितीसमोर आहेत.

बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांचा संभाव्य संघ

रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा

संबंधित बातमी : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा सहभाग, बीसीसीआयच्या बैठकीत निर्णय