रांची: कर्णधार धोनीच्या टीम इंडियाला रांचीच्या चौथ्या वन डेत पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडनं हा सामना 19  धावांनी जिंकून पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतही 2-2 अशी बरोबरी साधली असून मालिकेतील आपलं आव्हान कायम राखलं आहे.


झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 261 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारताचा डाव 48 षटकं आणि 4 चेंडूंमध्ये 241 धावांतच आटोपला. भारताकडून अजिंक्य रहाणेनं 57 धावांची तर विराट कोहलीनं 45 धावांची खेळी केली. पण टीम इंडियाच्या फलंदाजांना मोठी भागीदारी उभारता आली नाही. न्यूझीलंडकडून टिम साऊदीनं 3 बळी घेतले.  तर बोल्ट आणि निशम यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.
न्यूझीलंडच्या 261 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघानं अक्षरश: नांगी टाकली. विराट कोहली आणि रहाणेचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही. तर लोकल बॉय धोनीची फटकेबाजी पाहायला आलेल्या रांचीच्या चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. धोनी अवघ्या 11 धावा करुन बाद झाला. दुसरीकडे रोहित शर्मा, मनीष पांडे आणि केदार जाधव  हे फलंदाज देखील किवी गोलंदाजीसमोर सपशेल अपयशी ठरले.

दरम्यान, या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडनं 50 षटकांत 7 बाद 260 धावा केल्या. सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि टॉम लॅथमची 96 धावांची भागीदारी आणि विल्यमसनच्या 41 धावांच्या खेळीमुळं न्यूझीलंडनं 260 धावांपर्यंत मजल मारली.

भारताकडून अमित मिश्रानं दोन तर उमेश यादव, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.