मुंबई: जागतिक क्रिकेटचा बादशाह आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या मुंबईत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे. त्यातच विराट एका टॅटू पार्लरमध्ये दिसला. कोहलीने आणखी एक नवा टॅटू त्याच्या शरिरावर गोंदला आहे. हा त्याच्या अंगावरचा नववा टॅटू आहे.


सध्या भारतीय संघ टी ट्वेण्टी तिरंगी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातून कर्णधार कोहलीला विश्रांती दिली आहे. त्यामुळे मैदानाबाहेर असलेला कोहली, काहीसा मोकळा श्वास घेत आहे. यादरम्यान त्याने मुंबईतील एका टॅटू पार्लरमध्ये जाऊन टॅटू काढला.

विराट हा सध्याचा स्टाईल आयकॉन आहे. त्याच्या शरिरावर अनेक टॅटू आहेत. प्रत्येक टॅटू एक नवी स्टाईल असेल असं अनेकांना वाटतं. मात्र या प्रत्येक टॅटूचा वेगळा अर्थ आहे. टॅटू आपल्याला शक्ती देतो, कठीण काळात लढण्याची प्रेरणा देतो, अशी भावना कोहलीची आहे.

टी-20 तिरंगी मालिकेसाठी टीम इंडिया कोलंबोत दाखल

विराटने काढलेला नवा टॅटू हा त्याच्या शरिरावरील नववा टॅटू आहे. या नऊ टॅटूमध्ये एक टॅटू आई-वडिलांचा आहे, तर खांद्यावर ‘गॉड आय’ टॅटू आहे.  कोहलीने खांद्यावरच हा नवा टॅटू काढला आहे.

प्रत्येक टॅटू नवी प्रेरणा देते, असं कोहलीचं म्हणणं आहे.

एकीकडे कोहलीचे टॅटू वाढत असताना, त्याची मैदानावरील कामगिरीही दिवसेंदिवस बहरत चालली आहे. कोहलीने गेल्या 12 महिन्यात 11 कसोटी सामन्यात 1090 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

याशिवाय कोहलीने 29 वन डे सामन्यात 96.47 च्या सरासरीने तब्बल 1833 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 8 शतकं आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत.

दुसरीकडे 9 टी ट्वेण्टी सामन्यात कोहलीने 274 धावा केल्या आहेत. गेल्या 12 महिन्यात 13 शतकं झळकावणारा कोहली हा जगातील एकमेव फलंदाज ठरला.

श्रीलंकेत तिरंगी मालिका

दरम्यान, भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात टी ट्वेण्टी तिरंगी मालिका होत आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने कर्णधार विराट कोहली आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीसह कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या या प्रमुख शिलेदारांना विश्रांती दिली आहे.

कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे भारतीय संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे.

6 मार्चे ते 18 मार्च या दरम्यान ही तिरंगी मालिका रंगणार आहे. सलामीचा सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), दीपक हुड्डा, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (विकेटकीपर)

संबंधित बातम्या

टी-20 तिरंगी मालिकेसाठी टीम इंडिया कोलंबोत दाखल

श्रीलंकेतील 20-20 तिरंगी मालिकेसाठी कोहली, धोनीसह प्रमुख गोलंदाजांना विश्रांती

ना मोठेपणा, ना बडेजाव, शार्दूल ठाकूरचा लोकलने प्रवास!