IPL महाराष्ट्राबाहेर नेण्याचा विचार करा, कोर्टाचा BCCI ला सल्ला
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 12 Apr 2016 12:33 PM (IST)
मुंबई : आयपीएलसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्यासाठी तयार आहात का असा सवाल मुंबई उच्च न्यायालायानं बीसीसीआयला विचारला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयपीएलचे सामने व्हावे की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना कोर्टानं हा प्रश्न विचारला. महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ आहे. अशा स्थितीमध्ये बीसीसीआय मुख्यमंत्री सहाय्यता निधीला काही मदत करु इच्छिते काय, असा सवालही कोर्टानं विचारला आहे. एका सामन्यासाठी किती पाणी वापरलं जातं याची माहिती देण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब अर्थात महालक्ष्मी रेसकोर्सवरुन पाणी आणू, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनं कोर्टाला दिली. याप्रकरणी आजची सुनावणी स्थगिती करण्यात आली असून उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.