कार्डिफ : पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर 8 विकेट्स राखून एकतर्फी विजय मिळवला. यासोबतच पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.


पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला या सामन्यानंतर फायनलमध्ये कुणाशी खेळायला आवडेल, असा प्रश्नही विचारण्यात आला. मात्र भारत आणि बांगलादेश या दोन्हीही संघाला जिंकण्यासाठी शुभेच्छा. आम्ही कुणाशीही खेळण्यासाठी सज्ज आहोत, असं उत्तर सर्फराजने दिलं.

भारत आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारी दुसरा सेमीफायनल खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाचा मुकाबला अगोदरच फायनलमध्ये पोहोचलेल्या पाकिस्तानशी 18 जूनला म्हणजे रविवारी होईल.

इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानच्या संपूर्ण संघाने चांगली कामगिरी केली. गोलंदाज हसन अली हे आमचं प्रमुख शस्त्र आहे. त्याची कामगिरी संघासाठी महत्वपूर्ण असल्याचं सर्फराजने सांगितलं.

भारताने बांगलादेशवर मात करुन फायनलमध्ये प्रवेश केल्यास हसन अलीपासून सावध राहणं फलंदाजांसमोर मोठं आव्हान असेल. मात्र हसन अलीने भारताविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यात काही खास कामगिरी केली नव्हती. असं असलं तरी हसन अली 10 विकेट्ससह या मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.