मुंबई: कबड्डी विश्वचषकात इंग्लंडला तब्बल 51 गुणांनी पराभूत करुन भारतानं शानदारपणे सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतानं इंग्लंडला 69-18 गुणांनी पराभूत केलं.


या विजयानंतर भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सहवागनं खास आपल्या स्टाईलमध्ये ट्वीट करुन भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.

'इंग्लंड पुन्हा एकदा विश्वचषकातून बाहेर, फक्त यंदा खेळ बदलला आहे. यंदा इंग्लंड कबड्डीत हरला आहे. भारतानं त्यांना 69-18नं हरवलं, सेमीफायनलमध्ये धडक मारणाऱ्या भारतीय संघाला शुभेच्छा'


दरम्यान, याआधी रिओ ऑलिम्पिकवेळेस इंग्लंडचा पत्रकार पिर्यस मॉर्गन आणि सेहवागमध्ये चांगलंच ट्वीट युद्ध रंगलं होतं. रिओ ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिकल्यांनतर मॉर्गननं भारतावर टीका केली होती की, 'एवढी लोकसंख्या असलेल्या देशाला फक्त दोन पदकं?' असं त्यानं ट्वीट केलं होतं.

त्यावर सेहवागनं त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं होतं. 'आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आनंद साजरा करतो. पण ज्या इंग्लंडनं क्रिकेटची सुरवात केली त्याच इंग्लंडला अद्याप वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.'