कोलकाता : केवळ तीन महिन्याच्या आतच श्रीलंकेविरुद्ध पुन्हा एकदा कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झालेल्या टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चिंतेत आहे. एकाच संघासोबत तीन महिन्यात दोन वेळा खेळणं हा प्रेक्षकांसाठी ओव्हरडोस आहे. यामुळे प्रेक्षक खेळापासून दूर जातील, असं विराटचं म्हणणं आहे.


भारताने यापूर्वी श्रीलंकेत झालेल्या मालिकेत वन डे, कसोटी आणि टी-20 मध्ये श्रीलंकेला 9-0 ने मात दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतीय संघ उद्यापासून श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिली कसोटी कोलकात्यात खेळवली जाणार आहे.

एकाच संघासोबत वारंवार खेळणं प्रेक्षकांना खेळापासून दूर करु शकतं, असा असा प्रश्न विराटला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, ''याचं उत्तर प्रेक्षकांनीच दिलं पाहिजे, जे सामना पाहतात. कारण सामना पाहणं आणि खेळणं यात फरक आहे.''

एकच मालिका पुन्हा पुन्हा होत असेल तर ती आमच्यासाठी अडचण नाही. कारण आम्ही एकाच मानसिकतेत खेळतो आणि देशासाठी खेळतो. मात्र प्रेक्षक खेळापासून दूर जाऊ नये, यासाठी बदल गरजेचा आहे, असं विराट म्हणाला.