नवी दिल्ली : भारताचा युवा नेमबाज अंकुर मित्तलनं दिल्लीतील नेमबाजी विश्वचषकात रौप्यपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या डबल ट्रॅप नेमबाजीत त्याने ही कामगिरी बजावली. 25 वर्षीय अंकुरचं हे विश्वचषक स्पर्धांमधलं पहिलंच पदक आहे.


74 गुण मिळवणाऱ्या अंकुरची सुवर्णपदक जिंकण्याची संधी अवघ्या एका गुणानं हुकली. ऑस्ट्रेलियाच्या जेम्स विलेटनं 75 गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली. अंकुरनं याआधी आशियाई नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत 2014 साली सुवर्ण आणि 2015 साली कांस्यपदकाची कमाई केली होती.

दिल्लीतील विश्वचषकात अंकुरनं कमावलेलं पदक हे भारताचं या स्पर्धेतलं दुसरंच पदक ठरलं आहे. याआधी पूजा घाटकरनं या स्पर्धेत 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावलं होतं.

महिलांच्या 50 मीटर्स रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात नेमबाज तेजस्विनी सावंतला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

हीना आणि जीतूचं यश

हीना सिद्धू आणि जीतू राय या भारताच्या अव्वल पिस्टल नेमबाजांनी दिल्लीतील विश्वचषकात 10 मी. एअर पिस्टल नेमबाजीत मिश्र सांघिक प्रकाराचं विजेतेपद मिळवलं. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर आयोजित स्पर्धेत हीना आणि जीत जपानच्या युकारी कोनिशी आणि तोमोयुकी मात्सुदा या जोडीवर 5-3 अशी मात केली.

या विश्वचषकातलं भारताचं हे पहिलं सुवर्णपदक ठरलं असतं. मात्र या स्पर्धेत मिश्र सांघिक नेमबाजी ही केवळ चाचणी स्वरूपातच होत असल्यानं हीना आणि सिद्धूला प्रत्यक्षात पदक प्रदान करण्यात आलं नाही.

2020 साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिश्र सांघिक नेमबाजीचा समावेश करण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी फेडरेशनचा मानस आहे. त्याची चाचणी म्हणून पहिल्यांदाच विश्वचषकात मिश्र सांघिक नेमबाजीचा समावेश करण्यात आला आहे.