IPL 2024,  Virat Kohli Gift Bat to Rinku Singh : शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा 7 विकेटने दारुण पराभव केला. कोलकात्याने आयपीएलमध्ये सलग दोन सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकार झेप घेतली आहे. आरसीबीकडून फक्त विराट कोहलीने झुंज दिली. विराट कोहलीने शानदार नाबाद 83 धावांची खेळी केली, यामध्ये चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. विराट कोहलीशिवाय एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पराभव झाला, पण विराट कोहलीचा मनाचा मोठेपणा सध्या चर्चेत आहे. सामन्यानंतर विराट कोहलीने कोलकात्याच्या रिंकू सिंह याला काही टिप्स दिल्या. त्याशिवाय आपली बॅट भेट दिली. विराट कोहलीकडून बॅट भेट मिळाल्यानंतर रिंकू सिंह याने स्पेशल पोस्ट करत धन्यवाद म्हटलेय. याचे फोटोही त्याने पोस्ट केले आहेत. विराट कोहली आणि रिंकू सिंह याच्या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 






शुक्रवारी रात्री सामना झाल्यानंतर RCB vs KKR  संघातील खेळाडूंनी एकमेंकांचं हात मिळवले, काहींनी गळाभेटही घेतली. सामन्यानंतर केकेआरचे खेळाडू आरसीबीच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले होते. याचा व्हिडीओ आरसीबीने एक्सवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये आरसीबीचे कोच अँडी प्लॉवर यांनी खेळाडूंचं मनोबल वाढवणारे भाषण केले. आरसीबीने पोस्ट केलेल्या याच व्हिडीओत विराट कोहली याने रिंकू सिंह याला आपली बॅट गिफ्ट केल्याचेही दिसतेय. त्याशिवाय दोघांची गळाभेट झाल्याचेही दिसतेय. यासंदर्भात फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरजार चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांकडून विराट कोहलीचे कौतुक केले जात आहे. मॅच हरल्याचे दु:ख असतानही किंग कोहलीकडून दाखवलेल्या तत्परतेची चर्चा सुरु आहे.






रिंकू सिंहकडून स्पेशल धन्यवाद - 


विराट कोहली याचं रिकू सिंह यानं आभार मानले आहेत. रिंकूने विराट कोहलीसीठी खास पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यानं सल्ला दिल्याबद्दल आणि बॅटबद्दल विराट कोहलीचे आभार मानले आहेत. रिंकू सिंह याच्याशिवाय केकेआरनेही या दोघांचे फोटो पोस्ट केले आहेत. विराट आणि रिंकू यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 









विराट कोहलीची एकाकी झुंज - 


बंगळुरुच्या मैदानावर कोलकात्याविरोधात आरसीबीचे खेळाडू संघर्ष करत होते. ठरावीक अंतराने विकेट फेकत होते, पण दुसऱ्या बाजूला विराट कोहली पाय रोवून उभा होता. विराट कोहलीने अखेरच्या चेंडूपर्यंत कोलकात्याचा सामना केला. विराट कोहलीने 59 चेंडूमध्ये चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 83 धावांची खेळी केली. आरसीबीने 20 षटकांत 182 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने आयपीएलमध्ये लोगोपाठ दोन अर्धशतके ठोकली आहे. पण विराट कोहलीच्या संथ फलंदाजीमुळे त्याचावर काहींनी टीका केली, पण काहींनी इतरांनी साथ न दिल्यामुळे विराट कोहलीला संथ खेळावं लागलं, असं म्हटलेय.