Rajat Patidar RCB IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिल्यावहिल्या विजेतेपदाच्या निर्धारानं उतरलेल्य़ा बंगलोरनं एलिमिनेटरचं आव्हान पार केलंय. त्यामुळे आता त्यांच्य़ासमोर क्वालिफायर सामन्यात राजस्थानचं आव्हान असणार आहे. पण क्वालिफायरच्या या दुसऱ्या सामन्याचं तिकीट मिळवून देण्यात बंगलोरला मदत केली ती युवा फलंदाज रजत पाटीदारनं. पण महत्वाची बाब अशी आहे की या रजत पाटीदारवर बंगलोर संघानं लिलावात बोलीच लावली नव्हती. मग रजत पाटीदार संघात कसा आला? आणि त्यानं एलिमिनेटर सामन्यात काय कमाल केली? पाहूयात याचसंदर्भात... 


रजत पाटीदार...


बेस प्राईज 20 लाख...


अनसोल्ड...


होय...आयपीएलच्या मेगा लिलावात अनसोल्ड ठरलेला हाच रजत पाटीदार...15 व्या मोसमातल्या एलिमिनेटर सामन्यात मात्र हीरो ठरला. रजतच्या नाबाद शतकानं या सामन्यात बंगलोरला धावांचा डोंगर उभा करुन दिला. पाटीदारच्या शतकाच्या बळावर लखनौला हरवून बंगलोरचा संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या लढतीसाठी पात्र ठरला.  रजतनं अवघ्या 54 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांसह 112 धावा फटकावल्या. तेही तब्बल 207.41 च्या स्ट्राईक रेटनं. 


पण गम्मत अशी आहे की, फेब्रुवारीत झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावात हाच रजत पाटीदार चक्क अनसोल्ड ठरला होता. एकाही फ्रँचायझीनं त्याच्यावर बोली लावली नव्हती. पण आरसीबीचा लवनीत सिसोदिया जखमी झाला. त्याच्याजागी रजत पाटीदार संघात आला...


 29 वर्षांचा रजत पाटीदार मूळचा मध्य प्रदेशच्या इंदूरचा आहे.. वयाच्या आठव्या वर्षी तो क्रिकेट अॅकॅडमीत दाखल झाला. 2015-16 च्या रणजी मोसमात रजतनं आपल्या प्रथम श्रेणी कारकीर्दीला सुरुवात केली. तर 2018 मध्ये त्यानं मध्य प्रदेशकडून आपला पहिला टी20 सामना खेळला. 2021 च्या मोसमात बंगलोरकडूनच त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.


रजत पाटीदारच्या शतकामुळे बंगलोरनं आपल्या पहिल्यावहिल्या विजेतेपदाच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकलंय. पण आता त्यांच्यासमोर आव्हान आहे ते राजस्थानचं. क्वालिफायरच्या या सामन्यातही रजतकडून अशाच कामगिरीची अपेक्षा राहील. 27 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पुन्हा एकदा धमाल करण्यासाठी रजत पाटीदार सज्ज झालाय. 


सोबती खेळाडूंनी दिलं 'हनुमान' नाव -
रजत मध्य प्रदेशसाठी स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याने 2015 साली डेब्यू केला होता. त्याच्याबद्दल बोलताना एकदा गोलंदाज ईश्वर पांडे (Ishwar Pandey) यांनी तो संघासाठी हनुमानासारखा आहे. कायम संकटात संघाची मदत करण्यासाठी येत असतो. त्याने अनेक अशा दमदार खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे रजतला हनुमान हे नाव पडलं. विशेष म्हणजे महत्त्वाच्या सामन्यात रजत आरसीबीसाठीही हनुमानच ठरला आहे.