LSG Vs MI:  मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या 37 व्या सामन्यात लखनौच्या संघानं मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं. या हंगामातील मुंबईच्या संघाचा सलग आठवा पराभव आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून मुंबईसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा करता आल्या.


नाणेफेक गमावून लखनौच्या संघाची सुरुवात खराब झाली. लखनौच्या डावातील पहिल्याच चौथ्याच षटकात क्विंटन डी कॉकनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर कर्णधार केएल राहुल आणि मनिष पांडेनं संघाचा डाव सावरला.परंतु, पोलार्डच्या गोलंदाजीवर 12 व्या षटकात मनीष पांडे बाद झाला. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, केएल राहुलनं एका बाजूनं संभाळून ठेवली. तो अखेरच्या षटकापर्यंत क्रिजवर उभा राहिला. त्यानं 62 चेंडूत शतक ठोकलं. ज्यामुळं लखनौच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून लखनौसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. मुंबईकडून  रिले मेरेडिथनं आणि पोलार्ड यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स मिळाल्या. तर, डॅनियल सॅम्स आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येक एक-एक विकेट्स घेतली.


लखनौच्या संघानं दिलेल्या 169 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली. लखनौच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत मुंबईचा सलामीवीर ईशान किशन आणि डेवॉल्ड ब्रेवीसला स्वस्तात माघारी धाडलं. त्यानंतर रोहित शर्मानं संघाचा डाव सावरला. पंरतु, क्रुणाल पांड्यानं रोहित शर्माला आपल्या जाळ्यात अडकवलं. रोहितनं 31 चेंडूत 39 धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईच्या संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आली. मात्र, आयुष बदोनीनं त्याला सात धावांवर बाद करून माघारी धाडलं. मुंबईचे चार विकेट्स पडल्यानंतर मैदानात आलेल्या तिळक वर्मानं आक्रमक फलंदाजी केली. परंतु, तोही संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. त्यानंतर मुंबईची शेवटची आशा पोलार्डही क्रुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. मुंबईनं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. 


हे देखील वाचा-