RCB vs LSG Match : आरसीबी आणि लखनौ यांच्यामध्ये आज काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. बेंगलोरमधील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर अटीतटीची लढ होणार आहे. आरसीबीला एक सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सामन्यात आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. आरसीबीच्या खराब कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने मोलाचा सल्ला दिला आहे. इरफान पठाणच्या मते, विराट कोहलीने ओपनिंग करु नये. 


इरफान पठाण याच्या मते विराट कोहलीने सलामीला येऊ नये. विराट कोहली त्याच वेगाने धावा काढेल आणि संघाला विजय मिळवून देईल, याची शाश्वती नाही. कोलकात्याकडून 81 धावांनी पराभव झाल्यानंतर इरफान पठाण याने आरसीबीला हा सल्ला दिलाय. या सामन्यात विराट कोहली फक्त 21 धावांचे योगदान देऊ शकला. इरफान पठाण म्हणाला की, यंदाचा हंगाम आरसीबीसाठी वेगळा वाटतोय. कारण, विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत आहेत. अशा परिस्थितीत उतर फलंदाजांपुढे धावा काढण्याचे मोठे आव्हान असू शकते. विराट कोहली एखाद्या सामन्यात लवकर बाद झाला, तर इतर फलंदाजांनी तयार राहायला हवे. त्यामुळे माझ्या मते विराट कोहलीने सलामीला येऊ नये. 


आरसीबीचा मध्यक्रम कमकुवत - टॉम मूडी


ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू टॉम मूडी यांच्या मते आरसीबीचा मध्यक्रम कमकुवत आहे, यााच फायदा घेण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ करतील. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांना लवकर बाद करत आरसीबीला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न इतर संघाला असेल. जर पॉवरप्लेमध्ये दोन्ही फलंदाज बाद झाले तर आरसीबीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले जाऊ शकते. 


 आरसीबी आज नवीन रणनीती आखणार ?


फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ झालेल्या चुकापासून सावरून नवी सुरुवात करेल, असे वाटतेय. आरसीबी आपली लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस आतापर्यंत आपली भूमिका चोख बजावताना दिसलेत. दोन्ही सामन्यात आतापर्यंत चांगली सुरुवात मिळाली आहे. पण आज आरसीबी नव्या रणनीतीसह मैदानात उतरु शकते. 


M Chinnaswamy Stadium Pitch Report : चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी कशी आहे?


आज संध्याकाळी 7.30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात लढत होणार आहे. बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) हा सामना रंगणार आहे. ही खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजांसाठी अनुकूल आहे. येथे गोलंदाजांना खास कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 धावांची आहे. या खेळपट्टीवर अधिक धावा करूनच फलंदाजांवर दबाव आणता येतो. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचा फायदा होईल.