IPL 2022 : पाच वेळा आयपीएल चषक उंचावणाऱ्या मुंबईला यंदा सलग पाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. पण सरुवातीच्या पराभवानंतर मुंबईने अनेकदा चषक उंचावला आहे. पलटवार करण्यात मुंबई तरबेज आहे. पण यंदा आव्हान थोडं कठीण आहे, पण अशक्य नाही. पाच पराभवानंतर मुंबईचा संघ गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे, पण आयपीएल प्लेऑफच्या स्पर्धेतून अद्याप बाहेर गेलेला नाही. मुंबईला आणखीही संधी आहे. याआधीही मुंबईने पुनरागमन करण्याचा करिश्मा केला आहे. आयआधी मुंबईने लागोपाठ पाच पराभवानंतर प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती. 


2014 मध्ये पाच पराभव तरीही प्लेऑफमध्ये -
सुरुवातीच्या पराभवानंतर पुनरागमन करण्यात मुंबईचा संघ तरबेज मानला जातो. त्यांच्या चाहत्यांनाही याची कल्पना आहे. 2014 मध्ये मुंबईचा संघ सलग पाच सामन्यात हरला होता. तेव्हा मुंबईने दणक्यात पुनरागमन करत प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती. आता तोच करिश्मा मुंबई पुन्हा करणार का? पण यंदा आव्हान थोडं कठीण असणार आहे. कारण दहा संघ रणागंणात आहेत. 2014 मध्ये मुंबईला कोलकाता, आरसीबी, चेन्नई, दिल्ली आणि हैदराबाद या संघाकडून सलग पाच पराभवाचा सामना करावा लागला होता. 


 2015 मध्ये सलग चार पराभव, चषकावर कोरलं नाव -
2015 मध्ये मुंबईचा सलग चार सामन्यात पराभव झाला होता. त्यानंतरही मुंबईने आयपीएल चषकावर नाव कोरलं होतं. त्यावेळी मुंबईच संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर होती. त्यामुळे यंदा मुंबई इंडियन्स पुन्हा पलटवार करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इतकेच नाही, तर आयपीएलमध्ये मुंबईने अनेकदा सुरुवातीच्या सामन्यातील पराभवानंतर दणक्यात पुनरागमन केले आहे. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांना याची सवय झाली आहे. 


यंदा किती संधी?
तब्बल आठ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सवर सलग पाच सामने गमावण्याची नामुष्की ओढवली. यापूर्वी 2014 मध्ये देखील मुंबईला सलग पाच पराभव पत्करावे लागले होते. त्यानंतरही मुंबईने 14 गुणांसह प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. आता स्पर्धा दहा संघामध्ये होत आहे. त्यामुळे मुंबईसाठी आव्हान थोडं कठीण झालेय. पण अशक्य नाही. मुंबईच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 16 गुणांची गरज आहे. मुंबईचे अद्याप 9 सामने बाकी आहेत. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 9 पैकी आठ सामन्यात विजय मिळवावा लागेल. सुरुवातीच्या पराभवानंतर मुंबईने हा कारनामा अनेकदा केलाय. त्यामुळे मुंबईच्या चाहत्यांनाही यंदाही तशीच आपेक्षा असेल.