नवी दिल्ली : आयपीएलचा यंदा होणारा 13 वा सिझन पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आला आहे. BCCI अध्यक्ष सौरभ गांगुलीने एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, टूर्नामेंट तुर्तास रद्द करण्यात आली आहे. येणाऱ्या दोन महिन्यानंतरच आता 13 व्या सिझनच्या आयोजनाबाबत निर्णय होईल. आयपीएल 13 ची सुरुवात 29 मार्चपासून होणार होती. मात्र कोरोना संकटामुळे ही तारिख पुढे ढकलत 15 एप्रिल केली होती. मात्र आता पुन्हा लॉकडाऊन वाढल्यानंतर पुढील आदेशापर्यंत आयपीएल रद्द करण्याबाबत माहिती सौरभ गांगुलीने दिली.


याबाबत गांगुलीने सांगितलं की, सरकारने लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला आहे. त्यामुळं आयपीएल तुर्तास स्थगित केलं आहे. देशातील सद्य स्थिती पाहता बीसीसीआयजवळ आयपीएलचे आयोजन करण्यासंदर्भात खूप कमी पर्याय आहेत. यंदाच्या हंगामात आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास पुढील वर्षात आयपीएलचा लिलाव पार पडला जाणार नाही अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे. बीसीसीआयने तेराव्या हंगामाची आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. 29 मार्चपासून सुरु होणारी ही स्पर्धा बीसीसीआयने 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. मात्र आता एप्रिल-मे महिन्याच्या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

3 मे नंतर केंद्र सरकार लॉकाडाउन संदर्भात नेमकं काय निर्णय घेतं हे पाहिल्यानंतर स्पर्धेच्या भवितव्याबद्दल बीसीसीआय आपली अधिकृत बाजू मांडणार आहे. यंदा 29 मार्च ते 24 मे या कालखंडात आयपीएलचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा केंद्र सरकारने परदेशी खेळाडूंना व्हिसा देण्यास नकार दिला होता. सरकारने 15 एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांना व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आयपीएलमधील विविध संघांनी ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्याची मागणी बीसीसीआयला केली होती.

याआधी कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणारी एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द करण्यात आली आहे. मालिकेती दुसरा एकदिवसीय सामना 15 मार्च रोजी लखनऊ येथे खेळवण्यात येणार होता. तर तिसरा एकदिवसीय सामना 18 मार्च रोजी कोलकत्ता येथे खेळवण्यात येणार होता. परंतु, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांत खेळवण्यात येणारी एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.