बंगळुरु : आयपीएलच्या बाराव्या सीझनमध्ये खेळाडू आणि पंचांमधील वाद आणखीच चिघळत आहे. ताजं प्रकरण इंग्लिश अंपायर नायजेल लॉन्ग यांच्या रागाशी संबंधित आहेत. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील एका सामन्यादरम्यान रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि पंच नीजल लॉन्ग यांच्यात वाद झाला. या वादानंतर पंच लॉन्ग प्रचंड संतापले. हैदराबादच्या डावानंतर अंपायर रुममध्ये पोहोचले. आपला राग काढण्यासाठी त्यांनी अंपायर रुमच्या दरवाजावरच लाथ मारली. रागाच्या भरात असलेल्या लॉन्ग यांची लाथ एवढी जोरात होती की अंपायर रुमचा दरवाजाच तुटला.


पण यावेळी अनुभवी पंच लॉन्ग यांच्याकडून चूक नक्कीच झाली होती. टीव्ही रिप्लेमधील फुटेज समोर आल्यानंतर स्पष्ट झालं की, उमेश यादवचा मागचा पाय रेषेच्या मागेच पडला होता. नियमानुसार हा नोबॉल नव्हता. मात्र लॉन्ग यांनी नोबॉल दिल्याने विराट आणि उमेश यादव यांनी पंचांवर नाराजी दाखवणं साहजिकच होतं. मैदानातील स्क्रीनवर रिप्ले पाहिल्यानंतर उमेश यादव आणि विराट कोहलीने पंचांच्या निर्णयाचा विरोध केला, परंतु त्यांनी हा निर्णय मागे घेतला नाही.

VIDEO | पाकिस्तानबाबत सरकार आणि बीसीसीआय जो निर्णय घेईल तो मान्य : कोहली | एबीपी माझा



कर्नाटक क्रिकेट असोसिएशन CoA ला तक्रार करणार
प्रत्यक्षदर्शींच्या मते, सनरायझर्स हैदराबादचा डाव संपल्यानंतर लॉन्ज आपल्या सहकारी पंचांसह पॅव्हेलियनमध्ये आले आणि रागाच्या भरात त्यांनी अंपायर रुमच्या दरवाजावर जोरात लाथ मारली. यामुळे दरवाजाचं मोठं नुकसान झालं आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (केएससीए) प्रकरणाचा तपास सामनाधिकारी नारायण कुट्टी यांच्याकडे सोपवला आहे.

यानंतर लॉन्ज यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनशी बातचीत केली आणि नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपयेही दिले.

हे प्रकरण बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीसमोर (CoA) मांडण्याचं केएससीएने ठरवलं आहे, केएससीएचे सचिव सुधाकर राव म्हणाले की, "ही दुर्दैवी घटना होती. ही आमची जबाबदारी आहे याचा अहवाल द्यावा आणि याबाबत आम्ही CoA पत्र लिहित आहोत."