दोन वर्षांनी पुनरागमन, पण होमग्राऊंडबाबत संभ्रम
एबीपी माझा वेब टीम | 20 Jan 2018 09:07 PM (IST)
राजस्थान रॉयल्सच्या होमग्राऊंडबाबत अजून संभ्रमाची स्थिती आहे.
नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्स दोन वर्षांच्या निलंबनानंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. संघाने स्टीव्ह स्मिथला रिटेन करत मजबूत बांधणीची सुरुवात केली आहे. मात्र राजस्थान रॉयल्सच्या होमग्राऊंडबाबत अजून संभ्रमाची स्थिती आहे. राजस्थान रॉयल्सने आतापर्यंतचे सर्व आयपीएल सामने जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये खेळले आहेत. मात्र यंदाच्या मोसमात संघाला अद्याप होमग्राऊंड मिळालेलं नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, सोमवारी बीसीसीआयची बैठक होईल, ज्यामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सच्या होमग्राऊंडबाबत निर्णय होईल. अनेक दिवसांपासून निलंबित असलेल्या राजस्थान क्रिकेट असोसिएशनचंही नुकतंच बीसीसीआयमध्ये पुनरागमन झालं आहे. आरसीए अजून पूर्णपणे कार्यरत नसून काही प्रकरणं कोर्टात प्रलंबित असल्याचा बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांचा तर्क आहे. यावर 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टाने अगोदरच लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा आदेश बीसीसीआयला दिलेला आहे. राजस्थान रॉयल्सचे काही सामने लखनौच्या मैदानावर खेळवण्यात यावेत, असं बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांचं मत आहे. तर दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबनेही मोहाली हे होमग्राऊंड बदलून देण्याची मागणी केली आहे, जी बीसीसीआयने फेटाळली आहे. पंजाबचे काही सामने गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही इंदूरमध्ये खेळवले जाऊ शकतात.