192 टी-20 सामन्यानंतर कोहलीचं पहिलं शतक
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2016 05:24 AM (IST)
मुंबई : रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने राजकोटचं मैदान दणाणून सोडलं. विशेष म्हणजे 192 टी20 सामन्यांनंतर कोहलीने ट्वेन्टी 20 फॉरमॅटमधलं पहिलं शतक झळकावलं आहे. गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात विराटने नाबाद शतक ठोकलं. टी 20 मधलं विराटचं हे पहिलंच शतक ठरलं. विराटने 63 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 100 धावांची खेळी केली. आजपर्यंतच्या क्रिकेट कारकीर्दीत ही एकच कमतरता राहिली होती, ती आज पूर्ण झाल्याने स्वप्नपूर्ती झाल्याची भावना विराटने व्यक्त केली. मला फक्त धावा ठोकायच्या होत्या, मी माझं स्वप्न पूर्ण करु शकेन, असं वाटलंही नव्हतं. टी 20 मध्ये कोहलीच्या नावे 42 अर्धशतकं आहेत. आतापर्यंत विराटची टी 20 मधील सर्वोच्च धावसंख्या 99 होती. 2013 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात ही धावसंख्या उभारली होती. लोकेश राहुलनं नाबाद 51 धावा फटकावल्या. त्यामुळेच बंगलोरला 20 षटकांत 2 बाद 180 धावांची मजल मारता आली.