IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021 Update)सीझन 14 चा दुसरा टप्पा युएईमध्ये खेळला जाणार आहे. आयपीएल 14 (IPL 2021) पुन्हा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचं एका अधिकाऱ्यानं एएनआयला सांगितलं आहे.  बीसीसीआयने (BCCI)अद्याप या स्पर्धेच्या तारखांची अधिकृत घोषणा केलेली नाही. बीसीसीआय जून अखेर आयपीएल 14 च्या दुसर्‍या भागाचे वेळापत्रक जाहीर करू शकते. संबंधित अधिकाऱ्यानं सांगितलं की, बीसीसीआय आणि अमीरात क्रिकेट बोर्डामध्ये आयपीएलसंदर्भात चांगली चर्चा झाली. बीसीसीआयला खात्री आहे की, आयपीएलच्या उर्वरित 31 मॅचेच  दुबई, शारजाह आणि अबु धाबी येथे खेळल्या जातील. आय़पीएल 14 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी होईल असंही या अधिकाऱ्यानं सांगितलं.


अधिकाऱ्यानं सांगितलं की, चर्चा खरोखरच चांगली पार पडली. अमीरात क्रिकेट बोर्डाने बीसीसीआय एसजीएमच्या अगोदर आयपीएलचा उर्वरित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मौखिक मान्यता दिली होती. उर्वरित सामने पूर्ण करण्यासाठी 25 दिवसांचा वेळ बीसीसीआयनं मागितला होता, असं अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. विदेशी खेळाडूंच्या सहभागाबाबत त्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, याबाबत बीसीसीआयची अन्य देशांच्या क्रिकेट बोर्डांसोबत चर्चा सुरु आहे. यातून काही सकारात्मक बातमी पुढे येईल असं त्यांनी सांगितलं. जास्तीत जास्त विदेशी खेळाडू या सामन्यांसाठी उपलब्ध होतील, असंही त्यांनी म्हटलं.



इंडियन प्रीमियर लीग सीझन 14 मध्ये आतापर्यंत 29 सामने खेळले गेले आहेत. यावर्षी एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत आणि आता उर्वरित 31 सामने युएईच्या तीन मैदानांमध्ये दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळले जातील. कोणत्या मैदानावर किती सामने खेळवण्यात येणार आहे, हे अद्याप ठरलेले नाही.


10 डबल हेडर खेळले जाणार?
आयपीएल 14 चा दुसरा भाग आयोजित करण्यासाठी बीसीसीआयकडे फक्त 20 ते 22 दिवसांची वेळ आहे. म्हणूनच बीसीसीआय 10 डबल हेडर सामने खेळवण्याचा विचार करीत आहे, तर उर्वरित 11 दिवस दररोज एक सामना आयोजित केला जाईल, अशी माहिती याआधी मिळाली होती.


इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून झाली होती. आयपीएल 14 चा पहिला टप्पा मुंबई आणि चेन्नई येथे झाला होता. दिल्ली-अहमदाबादला स्थानांतरित होईपर्यंत ही स्पर्धा अतिशय यशस्वीरीत्या चालू होती. 1 मे रोजी बायो बबल ब्रेक झाला आणि एकाच वेळी अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. परिणामी बीसीसीआयला आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. बीपीसीआयने आधीच हे स्पष्ट केले होते की आयपीएल 14 रद्द झाल्यास त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. गेल्या महिन्यात जनरल बोर्डाच्या बैठकीत बीसीसीआयने आयपीएलला भारतातून युएईमध्ये हलविण्याची घोषणा केली होती.