मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात मुलाखती सुरु आहेत. टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मुडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेला आहे.


वीरेंद्र सेहवागनेही मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात मुलाखतीसाठी हजेरी लावली. क्रिकेट सल्लागार समिती मुलाखती घेणार आहे. सल्लागार समितीचे सदस्य सचिन तेंडुलकर लंडनमधून स्काईपद्वारे मुलाखत घेईल, तर सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण बीसीसीआयच्या मुख्यालयात उपस्थित असतील.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज मुलाखतींना सुरुवात होणार आहे. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग मुलाखतीसाठी बीसीसीआयच्या कार्यालयात दाखल झाला. पहिली मुलाखत सेहवागचीच होईल.

या सहाही जणांची नावं अंतिम यादीत निवडण्यात आले आहे. या सहा जणांच्या मुलाखतीनंतर मुख्य प्रशिक्षकाचं नाव जाहीर केलं जाणार आहे.

दरम्यान, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्या नावाचीच जोरदार चर्चा आहे. टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांशीही रवी शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत.

तर दुसरीकडे टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागही अंतिम सहा जणांमध्ये आहे. सेहवागने दोन ओळींचा बायोडेटा प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे पाठवला होता. शिवाय, आपलं नावच खूप आहे, असंही सेहवागने म्हटलं होतं. आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कुणाची निवड होईल, याची उत्सुकता अवघ्या क्रिकेटविश्वाला लागली आहे.