इंदूर : इंदूरच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियानं श्रीलंकेवर 88 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह टीम इंडियानं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.


रोहित शर्माच्या विक्रमी शतकाच्या जोरावर भारतानं श्रीलंकेसमोर 261 धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाला 17.2 षटकांत सर्वबाद 172 धावांची मजल मारता आली.

श्रीलंकेकडून उपुल थरंगा आणि कुशल परेरानं दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी रचत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यजुवेंद्र चहलनं थरंगाला बाद करत टीम इंडियाच्या मार्गातला मोठा अडथळा दूर केला. त्यानंतर कुलदीप यादवनं कुशल परेरासह तीन फलंदाजांना माघारी धाडत भारताचा मालिका विजय साजरा केला. तर यजुवेंद्र चहलनं 52 धावांत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.

दरम्यान, सुरुवातीला रोहित शर्मानं तुफानी फलंदाजी करताना 35 चेंडूत विक्रमी शतक झळकावलं. इंदूरच्या होळकर स्टेडियमवरच्या या सामन्यात रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियानं 5 बाद 260 धावांचा डोंगर उभारला होता. टी-20 च्या इतिहासात रोहित शर्मानं डेव्हिड मिलरच्या 35 चेंडूत शतक करणाच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

टीम इंडियानं उभारलेली ही टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्या ठरली. रोहितनं अवघ्या 43 चेंडूत 12 चौकार आणि 10 षटकारांसह 118 धावा झळकावल्या. त्यानं लोकेश राहुलच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारीही रचली.

लोकेश राहुलनं 48 चेंडूत 5 चौकार आणि 8 षटकारांसह 89 धावांचं योगदानं दिलं. तर रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या महेन्द्रसिंग धोनीनंही झटपट 28 धावा फटकावल्या.