पर्थ : मार्कस हॅरिस, अॅरॉन फिंच आणि ट्रॅविस हेडच्या दमदार अर्धशतकांमुळे ऑस्ट्रेलियानं पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर सहा बाद 277 धावांची मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार टिम पेन 16 आणि पॅट कमिन्स 11 धावांवर खेळत होता.


ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीच्या हॅरिस आणि फिंचने पहिल्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली. फिंचने सहा चौकारांसह 50 धावांचं योगदान दिलं.

डावखुऱ्या हॅरिसने दहा चौकारांसह 70 धावांची खेळी उभारली. त्यानंतर आलेल्या ट्रॅविस हेडनेही सहा चौकारांसह 58 धावांची खेळी साकारली. तर शॉन मार्शने 45 धावा केल्या.

भारताकडून ईशांत शर्मा आणि हनुमा विहारीने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर जसप्रीत बुमरा आणि उमेश यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.


टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना पर्थच्या ऑपट्स स्टेडियमवर रंगत आहे. भारताने अॅडलेडची पहिली कसोटी जिंकून, चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हीच विजयी लय कायम ठेवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर मायभूमीत भारताविरुद्ध प्रथमच सलामीचा कसोटी सामना गमावण्याची नामुष्की ओढवल्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत ‘कमबॅक’ करण्याचा ऑस्ट्रेलियन संघाचा मानस आहे.

दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताला मोठा झटका बसला आहे. दुखापतीमुळे फिरकीपटू आर अश्विन आणि हिटमॅन रोहित शर्मा यांना संघातून दुखापतीमुळे विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याने ते बाहेर झाले आहेत. अश्विन, रोहित आणि पृथ्वी यांच्याऐवजी अष्टपैलू हनुमा विहारी, जलदगती गोलंदाज उमेश यादव आणि रवींद्र जाडेजा यांचा 13 सदस्यीय संघात संधी देण्यात आली आहे.

अॅडलेडमधील पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माची कंबर दुखावली असून अश्विनला ओटीपोटाच्या दुखण्याचा त्रास झाला आहे. तर अॅडलेड कसोटीआधीच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना पृथ्वीला दुखापत झाली होती. त्यामुळे दुखापतीमुळे या तिघांनाही भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघाने अॅडलेड कसोटीमध्ये शानदार कामगिरी केली होती. पुजारा वगळता जवळपास सगळे फलंदाज अपयशी ठरले, पण गोलंदाजांनी त्यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयाचा शिल्पकार ठरलेला अश्विन आता पर्थ कसोटीत खेळणार नाही. टीम इंडिया या सामन्यात चार वेगवान गोलंदाजांसह खेळत आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा 11 सदस्यीय संघ : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा,  उमेश यादव