नवी दिल्ली : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात 3 कसोटी, 5 वन डे आणि एक टी-20 सामना खेळवला जाणार आहे. दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 26 जुलै रोजी खेळवला जाईल. कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.


अनेक दिवसांपासून कसोटी संघातून दूर असलेल्या रोहित शर्माचं पुनरागमन झालं आहे. तर युवा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याचाही संघात समावेश करण्यात आला आहे. अभिनव मुकुंद, रोहित शर्मा, केएल राहुल आणि मुरली विजय या चार सलामीवीर फलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

दुखापतीतून सावरलेल्या लोकेश राहुलचं संघात पुनरागमन झालं आहे. कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि ऋद्धिमान साहा यांच्यावर मधल्या फळीची मदार असेल.

इंग्लंडविरुद्ध त्रिशतक ठोकणारा करुण नायर, जयंत यादव आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. संघात चार वेगवान आणि तीन फिरकीपटू गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे.

नवखा खेळाडू कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आलंय, तर आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मालाही संधी देण्यात आली आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ :

रोहित शर्मा, मुरली विजय, लोकेश राहुल, अभिनव मुकुंद, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा.

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा

श्रीलंका दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 26 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सामना होणार नसल्याचीही माहिती आहे. दुसरा कसोटी सामना 3 ते 7 ऑगस्ट आणि तिसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट या काळात खेळवला जाणार आहे.

वन डे मालिकेची सुरुवात 20 ऑगस्ट रोजी दंबुलाच्या मैदानातून होणार आहे. दुसरा आणि तिसरा वन डे अनुक्रमे 24 आणि 27 ऑगस्टला खेळवला जाईल. तर चौथा आणि पाचवा वन डे खेट्टाराम इथे खेळवला जाणार आहे. याच मैदानावर एकमेव टी-20 सामनाही खेळवला जाईल.

श्रीलंकेचा संघ यापूर्वी 2015 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. टीम इंडिया जवळपास एका वर्षानंतर परदेशात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. भारताने परदेशात अखेरचा कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. टीम इंडिया या दौऱ्यावर नव्या मुख्य प्रशिक्षकासोबत जाणार आहे.